मराठी लेखक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेखक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

प्रभाते मल दर्शनम्।

    मागच्या नोंदीत मी अत्र्यांच्या शैलीबद्दल लिहले होते. त्यांच्या काही पुस्तकांची नावं सुद्धा त्यात होती. अत्र्यांचे एक पुस्तक 'ही ईश्वराची दया' मध्यंतरी वाचले. विविध विषयावरचे निबंध/लेख या पुस्तकात आहेत. 'प्राचीन भारत आणि गोमांस', 'प्राचीन भारतातील मद्यपान', 'आम्ही महार असतो तर..' असे एकाहून एक स्फोटक आणि भन्नाट लेख या पुस्तकात अत्र्यांनी लिहले आहेत. इथे त्याबद्दल अधिक काही लिहत नाही. इथेच सगळे लिहले तर तुम्ही ते पुस्तक कशाला वाचायला जाल? तर त्यातल्या एका लेखाचे शीर्षक आहे 'प्रभाते मल दर्शनम्|'

    'प्रभाते कर दर्शनम्' चा मूळचा संस्कृत श्लोक बहुतेकांना माहीत आहेच. तो इथे परत देत बसत नाही. या लेखात अत्र्यांनी विनोबा भावे यांचा खास त्यांच्या ष्टाईलने समाचार घेतला आहे. विनोबा भाव्यांचे एक वचन/मत असे आहे की प्रभाते मल दर्शनम्|. (मला वाटतं ’माझा साक्षात्कारी हृदयरो’ मध्ये अभय बंग यांनीही या वचनाचा उल्लेख केला आहे.) तर विनोबांच्या मते सकाळी मलाचे दर्शन घेऊन त्याच्या रुपावरुन आपल्या प्रकृतीचे उत्तम विश्लेषण करता येते. त्यानेच आहार विहार सुधारुन उत्तम आरोग्य संपादता येते. शिवाय आपल्या शरीरातून बाहेर पडलेल्या मलाचे ओंगळ रुप पाहून शरीराबद्दल अनासक्ती उत्पन्न होते वगैरे वगैरे....

अत्र्यांनी याचा समाचार घेताना म्हटले आहे
    'भंगी लोकांना रोजच्या रोज सामुदायिक मलदर्शन होते. मग त्यांना उत्तम तर्‍हेच्या आरोग्याचा, वैराग्याचा नि ऐश्वर्याचा कुठे लाभ होतो?'
    'मानवी शरीर हे खरोखरच निसर्गाचे देणे आहे. त्यात नाना तर्‍हेचे सौंदर्य भरलेले आहे. रुपाचे आहे, रंगाचे आहे, आकृतीचे आहे, बलाचे आहे, नाना तर्‍हेच्या गुणाचे आहे. अरे जा रे जा, आम्ही निसर्गाची निरामय अपत्ये ह्या सृष्टीतल्या हर्षाचा, आनंदाचा नि संतोषाचा आजन्म मनसोक्त आस्वाद घेऊ. तुम्ही पाहिजे तर खुशाल तुमच्या कमोदात दाढी खुपसून आपल्या मलाचे यथेच्छ दर्शन नाही तर सेवन करत बसा.'

    बापरे! काय भयंकर आहे ही भाषा! वाचता वाचता कधी अशा भाषेतलेही काही वाचायला मिळते.
Tags: Literature, Satire, Parody

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

अत्रे शैली...

    आचार्य अत्र्यांचे लिखाण मला आवडते. इतरांनाही आवडत असावे, पण असं कुणी फारसे म्हणताना दिसत नाही. कारण म्हणायचा अवकाश की अत्रे विरोधक लगेच पुढे सरसावतात. आणि मग तुम्हाला वेड्यात काढतात, तुमच्या चुका दाखवतात. त्यांचे कुठे चुकले, ते असेच होते, त्यांचे वागणे तसेच होते इ.इ. गोष्टी उदाहरणांसकट ते तुम्हाला सांगतात. थोडक्यात काय तर ते तुम्हाला झोडपू पाहतात. पण आपण तिकडे लक्ष देऊ नये.
    मला वाटते अत्र्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की ज्यांना ते आवडतात त्यांना ते शंभर टक्के आवडतात आणि आवडले नाही तर बिलकूलच आवडत नाहीत. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटला तर तो तुम्हाला असे म्हणणार नाही की, "अरे अत्रे काय फाकडू लिहतात रे! पण त्यांचे इथे जरा चुकलेच" वगैरे वगैरे. एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे.
    अत्र्यांचे लिखाणातले मला आवडते ती म्हणजे त्यांची भाषा. अत्र्यांइतके सुगम, सोपे मराठी लिहणारे मराठी भाषेत इतर कोणी असल्यास मला ते माहित नाही. त्यांची काही पुस्तके वाचली आहेत (महापूर, हशा आणि टाळ्या, बत्ताशी आणि इतर कथा, मी कसा झालो, कर्‍हेचे पाणी इ.)त्यावरुन मला तरी असे वाटले. त्यात बोजड, कृत्रिम भाषा सापडणार नाही. ज्याचा मराठी वर्तमानपत्रे, मराठी साहित्य म्हणेज एकूणातच लिहिण्यावाचण्याशी फारसा संबंध आला नाही अशा व्यक्तीलाही समजण्यास अडचण पडणार नाही असे.
    वृत्तपत्र चालवण्यात अत्र्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने असे असावे. वृत्तपत्रातली भाषा हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यात जडजंबाल भाषेत लिहून काही उपयोगाचे नाही. एकदा वाचून समजले नाही तर लोक सरळ पान उलटतात. परत वाचून समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. दुसरे असे की वृत्तपत्राचे आयुष्य असते उणेपुरे एक दिवसाचे. दुसर्‍या दिवशी त्याची रद्दी होते. पुढे त्याचा काही वापर झालाच तर तो फुलपुडी बांधण्यात किंवा वाण्याकडे.
    त्यामुळे अत्र्यांची हीच सोपी भाषा इतर साहित्यातही उतरली असे मानता येईल. अर्थात त्यांनी स्वत: असा काही विचार केला होता का हे आपल्याला आता कसे कळणार?
tags: literature, writing style, opinion, newspaper
-सौरभ.

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०

ललित नभी मेघ चार....

   काही दिवसांपूर्वी शांता शेळके यांचे 'ललित नभी मेघ चार' वाचत होतो. ललित लेख आणि ते देखील शांताबाईंचे हा एक दुग्धशर्करा योग आहे. मुळात ललित हा प्रकारच इतका सुंदर आहे (ललित नावाखाली बोजड, दुर्बोध आणि अति अलंकारिक भाषा वापरुन ललित लिहणारे इथे अपेक्षित नाहीत.) तर या पुस्तकात असाच काही संदर्भासाठी विल ड्युरंट यांचा आधीच्या नोंदीतला परिच्छेद शांताबाईंनी दिलेला आहे. साध्या सोप्या भाषेतला हा मराठी अनुवाद या नोंदीत बघू.
   "मानवी संस्कृती हा एक वाहता प्रवाह आहे. त्याला किनारे आहेत. माणसे आपापसात लढतात. चोर्‍यामार्‍या करतात. एकमेकांचा वध करतात. खूप संघर्ष करतात. त्यांच्या रक्ताने हा प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या संघर्षाची, रक्तपाताची इमानेइतबारे नोंद करतो. पण त्याच वेळी याच या प्रवाहाच्या दोन्ही तीरांवर, शांतपणे, कुण्याच्या ध्यानातही येणार नाही अशा रीतीने, माणसे प्रेम करतात. विवाहबद्ध होतात. मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करतात. गाणी म्हणतात, नाचतात आणि कविता लिहतात. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणजे खरोखर या प्रवाहाच्या तीरावर जे घडते त्याचा इतिहास असतो, असायला हवा. पण इतिहासकार निराशावादी असतात त्यामुळे संस्कृतिप्रवाहाच्या तीरावर जे जीवन फुलत असते त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि तिच्या रक्तलांच्छित प्रवाहाचेच चित्रण करत राहतात. "

   असं काही वाचलं की वाटतं वाचनाच्या आवडीचं सार्थक झालं. पण असं काही वाचलं की हमखास वाटतं की अरे मलाही असं काही लिहता आलं असतं तर.....
जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.
tags: Will Durant, History, English Literature

-सौरभ.