मंगळवार, १८ मे, २०१०

परिक्षेचा दिवस...

    म्हणता म्हणता परीक्षा जवळ आलीये, जवळ आलीये करत आली सुद्धा. शेवटच्या महिन्यात अभ्यासाने चांगलाच जोर पकडला होता. कवितांचा अर्थ लावून लावून डोक्याचा पार भुगा होऊन गेला. दुर्बोध लिहणार्‍या कवींनी माझ्याकडून अजून चार शिव्या खाल्ल्या. ग्रीक मायथॉलॉजी नसती तर ह्या लोकांना उपाशी मरावे लागले असते हे माझे मत अजूनच ठाम झाले. लिटररी क्रिटिसिझममधून दुसर्‍यांवर टीकाटिपण्णी करता करता काही लेखकांना आपण स्वत:ही किती रटाळ पुस्तके लिहली आहेत याचेही भान राहिले नाही. निदान प्रसिद्ध करण्यापूर्वी स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण केले असते तर आपण लिहलेल्या लिखाणातल्या एकाही वाक्याचा अर्थ लागत नाही हे तरी त्यांच्या लक्षात आले असते. अर्थात यातही, वाळवंटात रखरखाटाने जीव जायची पाळी यावी आणि अचानक हिरवाईने मन सुखावून जावे, असे अनुभव देणारे प्राईड ऍंड प्रेज्युडिससारखे पुस्तकही होते, नाही असे नाही. तरीही एकंदर तक्क्यावर रेलून आरामशीरपणे पुस्तक वाचणे वेगळे आणि What is the tragic flaw in the character of Othello? How far it is responsible for his tragedy? या प्रश्नाचे उत्तर लिहणे वेगळे! नाही का?
    तर परीक्षेचा दिवस उगवला. सकाळी अकरा ते दुपारी दोनचा पेपर होता. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात यंदा आमचे स्थळ आले होते. तसे पाहता या वेळी विद्यापीठाने ते खूपच जवळ दिले म्हणायचे. मागच्या वर्षी त्यांनी मला इंदिरा कॉलेज, ताथवडे इकडे पाठवले होते होते. परीक्षा केंद्र निवडताना पुणे निवडल्याचे मला स्पष्ट आठवत होते. आमच्या गरीबांच्या ऑक्सफर्डला ताथवडे पुण्यातच आहे असे वाटले असावे. त्यावेळी जायला एक; यायला एक तास लागत होता. मला मात्र वाटत होतं की मुंबईलाच चाललो आहे परीक्षा द्यायला.
    मात्र यंदा तसे नव्हते. परीक्षेची वेळही सोयस्कर होती. अभिजीतने जाता जाता मला सोडले असते आणि येताना मी आलो असतो. त्याला म्हटले, आपण गाडीतूनच जाऊया. तो हो म्हणाला. (नाहीतरी त्याला असे कुणीतरी म्हणायचे कारण पुरते, लगेच गाडी नेण्यासाठी.) मग निघालो. पुण्यातच जायचे असले तरी सकाळची वाहतूक लक्षात घेता वेळ तर लागणारच होता. गाडीत वाचायला मात्र काही घेतले नाही. उगाच गाडीत वाचायला काहीतरी घ्या आणि नंतर मळमळत असताना एम.ए. चा पेपर लिहा, असे नको व्हायला. मग पोहोचलो परीक्षा केंद्रावर.
एम.एच्या परीक्षांना सगळ्या प्रकारचे लोक हजर असतात. काही काही वेळा वृत्तपत्रात जसे 'समाजाच्या सर्व थरातून लोक आले होते' असे लिहलेले असते अगदी तसेच एम. ए.च्या परीक्षांचे असते. अगदी '८३व्या वर्षी आजींनी दिली एम.ए.ची परीक्षा' या बातमीतल्या आजीबाई नसल्या तरी कॉलेजकुमारांपासून ते ज्येष्ठ नागरीक म्हणता येईल इतपत विविध वयोगटातले परीक्षार्थी हजर असतात. बहुतेकांच्या हातात बाजारात मिळणार्‍या एकाच लेखकाच्या नोट्स होत्या. या नोट्सचा दर्जाही काय वर्णावा? तसे पाहिले तर एम.ए.च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांचे हाल कुत्राही खात नाही. अगदी अभ्यासक्रम मिळवण्यापासून ते 'मटेरियल' गोळा करण्यापर्यंत त्यांना रक्त आटवावे लागते. परत मूळ पुस्तकं मिळायची मारामार. मूळ पुस्तक मागितले की अप्पा बळवंतातले दुकानदार हा कुठल्या परग्रहावरुन आला आहे असा चेहरा करुन तुमच्याकडे बघतात. आजूबाजूचे चारपाच जणही तुमच्याकडे अथ पासून इतिपर्यंत टवकारुन बघतात. च्यायला आजकाल मूळ पुस्तक वाचतो कोण?
    परत आणि पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाबद्दल काय बोलावे? (खरोखर काहीच बोलत नाही. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहता येईल. उगाच ब्लॉगच्या एका उत्तम लेखाचा विषय कशाला वाया घालवा?)
    आपला नंबर कोणत्या खोलीमध्ये आला आहे हे बघण्यासाठी नोटीस बोर्डाजवळ भयंकर गर्दी उसळलेली असते. तिथे जाऊन मी माझा नंबर शोधतो. परीक्षा हॉलमध्ये शिरताना एवढा गलका कसला चालला आहे असा विचार केल्यावर लक्षात येते की अरे इथे जवळ जवळ ९० टक्के स्त्रियाच जमल्या आहेत. जशा सामुदायिक पोथी वाचन वगैरेला महिला जमतात तशा सामुदायिक एम.ए.परीक्षा द्यायला एखादे महिला मंडळ आले आहे की काय? प्रत्येकजण अगदी अनेक वर्षांच्या ओळखी असल्यासारख्या एकमेकींशी बोलायला सुरुवात करतात. अर्थात मला त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही पण थोडे अस्वस्थ वाटायला लागते. या सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध डाव केला आहे, ते सगळेजण मिळूनच पेपर लिहणार आहेत वगैरे वगैरे विचार माझ्या मनात यायला लागतात. मग परीक्षक वर्गात प्रवेश करतात. "सगळ्यांनी आपापल्या बॅगा, पर्स, सॅक्स पुढे आणून ठेवा. मोबाईल स्विच ऑफ करुन आपापल्या बॅगेत ठेवा. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नये."वगैरे वगैरे.....
अचानक माझ्या लक्षात येतं की दरवेळेस माझ्या पुढच्या बाकावरचा परीक्षार्थी गैरहजर असण्याची परंपरा यंदा मोडीत निघालेली आहे. एक मुलगी माझ्या पुढच्या बाकावर बसलेली आहे. अर्थात तिचं लिहलेलं बघून मला उत्तरं लिहता येतील अशी शक्यता नसते. (परीक्षेत दहा बारा निबंधासारखी उत्तरं लिहायची असताना कॉपी कसली करणार डोंबलाची?) पण दरवेळेस परीक्षकच चालता चालता मध्येच त्या रिकाम्या बाकावर बसतात आणि एखादा सरडा जसा अगदी पार्श्वभूमीच्या रंगासारखा रंग घेऊन एकरुप होऊन जातो, तसाच हा परीक्षकही विद्यार्थ्यांत बसून, कॉपी करणार्‍याला रंगेहाथ पकडायचा विचार करत असावा. मात्र यावेळेस तसं होणार नसतं.
    मग उत्तरपत्रिका मिळते. माझ्या आख्ख्या विद्यार्थीजीवनातल्या सवयीप्रमाणे मी लगेच पानाच्या दोन्ही बाजूने अगदी थोडे थोडे समास आखून घ्यायला सुरुवात करतो. आपला परीक्षा क्रमांक, तारीख, विषय, सेंटर लिहून होतं. इंग्रजीच्या पेपरलाही मिडीयम ऑफ आन्सर लिहावे लागते. पाच दहा मिनिटं होतात आणि मग तो चिरपरिचित टण्णऽऽ असा आवाज होतो आणि 'याचसाठी केला होता अभ्यास' असं जिच्याबाबत म्हणता येईल ती प्रश्नपत्रिका माझ्या हातात येते. मी ती अधाशासारखी वाचायला सुरुवात करतो.

ह्म.... ह्म.....
अच्छा! .....
हा प्रश्न विचारलाय काय? .....
बोंबला.....
अरे चोरांनो..... कात्रीत पकडायला बघता काय?.....
अरेच्चा हा तर मागच्या वर्षीच्या पेपरात पण होता. अरेरे! मागच्या वर्षी आला म्हणून या वेळी येणार नाही असं वाटून त्याकडे फारसे लक्षच दिले नव्हते आपण....
अरे वा! याचे मुद्दे तर आपण सकाळीच वाचले आहेत. वा वा वा! .....

    माझे विचार सुरु होतात. मग एकदम वाचतच किती वेळ गेला हे लक्षात येऊन मी झरकन लिहायला सुरुवात करतो.
वेळ सरकत सरकत पुढे चाललेला असतो. थोडंफार लिहून होतं. मी इकडे तिकडे नजर टाकतो. काही हात भरभर लिहण्यात गुंतलेले असतात. काही शून्यात नजर लावून बसलेले असतात. असं रिकाम्या बसलेल्या लोकांकडे बघितल्यावर जरा बरं वाटतं. मात्र आता एक नवीनच त्रास सुरु झाला असल्याचं मला जाणवतं. माझ्यासमोर बसलेल्या मुलीचे केस सॉलीड लांब आहेत. अगदी शाम्पूच्या जाहिरातीत दाखवतात तसे 'स्मूथ नि सिल्की'! मध्येच तिने मानेला झटका दिला की तो आख्खाच्या आख्खा केशसांभार इकडून तिकडे हालतो. माझं लक्ष विचलित होतं. काय वैताग आहे हा? थोडं लिहलं की लगेच झटका. अजून एक परिच्छेद लिहला की परत झटका. मी वैतागतो. मग तो सरडा परीक्षकच काय वाईट होता?
    या वर्गात वरती फॅन लावलेले आहेत पण ते दोनच आहेत आणि नेहमीप्रमाणे माझ्यापासून बरेच लांब आहेत. एखादी वार्‍याची झुळूक आलीच तरी त्या गरम वार्‍याने बिलकूल गार वाटत नाही. बर्‍यापैकी उकाडा जाणवत राहतो. पांडुरंग सांगवीकरसारखा आपणही शर्ट काढून पेपर लिहावा की काय असा विचार माझ्या मनात येतो. पण तेवढे धाडस माझ्याच्याने अर्थातच होत नाही. उगाच एवढ्या बायाबापड्यांसमोर असला आचरटपणा कसा करणार?
    बघता बघता पेपराची वेळ संपत येते. शाम्पू मुलगी पण जोरात लिहीत असते. नेहमीप्रमाणे मी मागे पडलेला असतो. सुरुवातीच्या अक्षरात आणि आताच्या अक्षरात थोडा फरक दिसायला सुरुवात झालेली असते. रिस्टोरेशन कॉमेडीचे मुद्दे आठवता आठवत नसतात. बर्‍याच प्रयत्नांनी एक मुद्दा आठवतो. Licentious way of living..... दुसरा आठवतो Loose morals..... मग पुढचे सगळेच आठवायला लागतात Adulterous relationships.....वगैरे वगैरे

    ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चं जसं गणितात एक आणि एकच उत्तर असतं तसं एम.ए. बाबत कधीच होत नाही. शिवाय गणितात आख्खा पेपर सोडवल्याचं एक समाधान तरी जाणवतं. आपण काय गणितं सोडवली आणि किती गुण मिळणार आहेत याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. इथे तसं काहीही नसतं. कितीही लिहलं तरी ते पुरेसं असल्यासारखं वाटत नाही. शेवटी शेवटी लिहून लिहून आपल्याला हात आहे की नाही याची जाणीवदेखील राहत नाही. अजून थोडा वेळ तसंच लिहलं तर सरळ हातापासून त्याचा वेगळा तुकडा पडेल असं वाटायला लागतं.
    वेळ संपल्याची घंटा होते. परीक्षक पेपर गोळा करायला सुरुवात करतात. एखादा चिवट गडी अजूनही लिहितच असतो. परीक्षक त्याच्या हातातून पेपर जवळजवळ हिसकावून घेतात. मी हाताची बोटं तुटेपर्यंत वाकवून, गेलेली संवेदना परत मिळवायचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीसारखाच गलका वर्गात आता परत सुरु झालेला असतो. प्रश्नपत्रिकेचं पद्धतशीर शवविच्छेदन सुरु झालेलं असतं. शिवाय मला नेहमीप्रमाणे मागून काहीतरी शब्द ऐकू येतात, "आमचे हे नंदूरबारला असतात." "मग तुम्ही काय नोकरी वगैरे करता का?" वगैरे वगैरे... मात्र नंदूरबार पुण्यापासून किती लांब आहे याचा काही अंदाज नसल्याने नक्की किती हळहळ व्यक्त करावी हे मला कळत नाही. फारसा वेळ न घालवता मी पॅड, कंपास सॅकमध्ये भरतो आणि बाहेर पडतो.
    बाहेर आल्यावर उन्हाचा कडाका पाहून परीक्षा हॉलमधलं उकडणं म्हणजे काहीच नाही हा निष्कर्ष सहज निघतो. परत मग रिक्षाचा शोध. एकजण पुणे सातारा रोडला यायला तयार होतो. नेहमीसारखा खडाक टिंग आवाज नि रिक्षाचा प्रवास सुरु! दुपारच्या दोन वाजताच्या ऊन्हाच्या गरम झळा रिक्षात प्रवेश करत असतात. मी केलेला अभ्यास, मी लिहलेला पेपर आणि मला मिळणारे गुण यांचा विचार करत मी आरामशीरपणे मागे टेकून बसतो. चुक..... चुक..... चुक अशा आवाजात मीटरचे आकडे पडत राहतात.

सोमवार, १० मे, २०१०

दैनंदिनीतले एक पान...

    मराठी ग्रंथालयातून आणलेली पुस्तकं बरीच दिवस बदललेली नव्हती. गोनीदांचे रामायण तर एका बैठकीतच संपवले होते. दुसरे होते ते द. पा. खांबेटे यांचे मोठ्या माणसांच्या गंमतीदार गोष्टी. राजवाडे, सेतूमाधवराव पगडी, वासुदेवशास्त्री खरे, टिळक, आगरकर, राजारामशास्त्री भागवत, न.चि. केळकर, ज्ञानकोशकार केतकर, धर्मानंद कोसंबी, वा.म. जोशी, रानडे अशा पर्वतप्राय व्यक्तींच्या अनेक आठवणी, किस्से, त्यांचा व्यासंग वगैरे वगैरे...
    अभिजीत गाडीवरुन सोडतो म्हणाला. येताना बसने येणार होतो. निघालो. अभिजीतचे गाडी चालवणे म्हणजे काय! जीव मुठीत धरुनच त्याच्या मागे बसावे लागते. त्यात गाडी पण करिझ्मा. मग काय विचारायलाच नको. पुण्यातल्या वाहतुकीची तर मी धास्ती घेतली आहे. आधीच चालता नीट येण्याची मारामार, त्यात घरी सुखरुप येतो की नाही याची निश्चिती नाही.
ग्रंथालयात गेलो तर फारशी गर्दी नव्हती. हे ग्रंथालय म्हणजे पुणे मराठी ग्रंथालय. भलेमोठे आहे. कुठले पुस्तक मिळत नाही असे होत नाही. प्रत्येक पुस्तकावर साडेतीन रुपये असा सात रुपये दंड भरला. या ग्रंथालयात दहा दिवसात पुस्तक बदलावे लागते, नाहीतर दंड भरा. ब्रिटीश लायब्ररीत मात्र असे नाही, महिनाभर तर ठेवताच येते पण फोनवरुनही मुदत वाढवता येते. ब्रिटीश लायब्ररीबद्दल बरेच सांगण्यासारखे आहे ते नंतर कधीतरी.
    विशेष असे कुठलेच पुस्तक घ्यायचे नव्हते. त्यामुळे जास्त धुंडाळत न बसता टेबलावरच मिळालेली दोन घेतली. निवडक केशवसुत आणि निरंजन घाटे यांचा मृत्यूदूत हा विज्ञानकथा संग्रह.
    मग निघालो परत चालत, 'नीलम’ भांड्यांचे भले मोठे दुकान मागे पडले. नुमविच्या समोर आलो. या शाळेला इतके भयंकर रंग दिले आहेत अलीकडेच. कुणीतरी एखाद्या इमारतीला रंग देताना मूळ रंगांचा वापर करेल का? लाल काय, काळा काय, पिवळा काय कशाला काही अर्थच नाही. एखाध्या नुमवियाला याचा राग येईल पण खरेच हे रंग फारच विचित्र दिसतात. पुढे निघालो, अप्पा बळवंत चौक! जिकडे बघावे तिकडे पुस्तकांचीच दुकाने. धार्मिक पाहिजेत ती आहेत, कथा कादंबर्‍या आहेत, शालेय आहेत, क्रमिक आहेत, नोट्स आहेत गाईड्स आहेत, इंग्रजी आहेत, अनुवादित आहेत. पांढर्‍यावर काळे करण्यासाठी लागणार्‍या स्टेशनरीची भलीमोठी दुकाने आहेत. कोणी रस्त्यावर पथार्‍या मांडून बसले आहे, कोणी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत आहे, कुणी विकत घेत आहे. यात भर म्हणजे सकाळचे अकराचे रणरणते उन आणि पुणेरी रस्त्यांवरची अविभाज्य, बेफाम वाहतूक. मध्येच एमेटीवर एक ज्येष्ठ गृहस्थ आपल्या नातीला घेऊन निघाले होते. सिग्नलची वेळ संपली तरी हे आपले चाललेच आहेत पुढे पुढे. पोलिसाने शिट्टी वाजवली, त्यांना साईडला घेतले. मी पुढे निघालो, तर "एवढे काय अर्जंट काम काढले आहे आज, काका?" असे काहीतरी शब्द मागे ऐकू येत होते. प्रगतीत घुसलो. माझे एक अभ्यासाचे पुस्तक घेतले. बिचार्‍याकडे नव्हते, ते त्याने दुसरीकडून आणून दिले.
    मग पुढे चालत परत वसंत टॉकीजला आलो. सकाळच्या वेळेस फारशी गर्दी नव्हती. बसेस येत होत्या, जात होत्या, माणसे उतरत होती, चढत होती, काही पुढेच जाऊन थांबत होत्या, त्यांच्या मागे माणसांची पळापळ, कोणी मध्येच थुंकत होते. मग शेवटी बस आली एकदाची. बसमध्ये आलो. एकदम रिकामी. ड्रायव्हर,कंडक्टरशिवाय त्यात कुणीच नव्हते. गजबजलेल्या रस्त्यांवरुन बस निघाली. पुढेच बसलो होतो. थोडी पुढे जातेय न जातेय तोच परत बस थांबतेय, मध्येच एखादा रिक्षावाला कडमडतोय. बसची पाटी जरा विचित्रच आहे. विचित्र म्हणजे ती उलटी लावलेली आहे. कात्रज ते आकुर्डी स्टेशन. त्यामुळे बस आकुर्डीवरुन येऊन कात्रजला जाणार असूनही ती कात्रजला चाललीये की आकुर्डीला हे लोकांना कळत नाहीये. लोक मग पुढच्या दारात येऊन ड्रायव्हरला विचारतात. एक मध्यमवयीन गृहस्थ विचारतो,"कात्रज का?" ड्रायव्हर काहीच उत्तर देत नाही. गृहस्थ निघून जातो. पुढे एक बाई विचारते, "कात्रज का?" ड्रायव्हर या आत अशी मान हलवतो. बाई आत येते. कंडक्टर एव्हाना माझ्याजवळ येतो. मी दहा रुपयांची नोट देतो. तो एक रुपया सुट्टा मागतो. मी पाच रुपये आणि तिकीट घेतो. बस अजून पुढे सरकते. ती सरकतच असते. बहुतांश वेळ पहिल्यावरच, क्वचित दुसर्‍यावर आणि तिसरा टाकायला तर ड्रायव्हरला वेळच मिळत नाही. मला मात्र क्लच जास्त वेळ दाबून ठेऊ नये हा गाडी शिकताना शिकलेला धडा आठवतो. च्यायला, ही अवाढव्य बस किती ऍव्हरेज देत असेल? ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस, इंधनबचत यांबद्दल या गृहस्थाचे काय मत असावे?
    पुढे हळूहळू सरकत बस मंडईजवळ येते. इथेही भयंकर गर्दी आहे. एवढे लोक, एवढी त्यांची खरेदी, बारीकसारीक टेंपो, हातगाड्या, मध्येच लागणारी मंदिरं, त्यापुढच्या भक्तांच्या रांगा, कोणी फुलं विकतंय, कोणी नारळ विकतंय, सॉलिड गोंधळ चालू आहे. स्वारगेटला आलो तर वाहतुकीची जाम कोंडी झालेली. इंचाइंचाने सुद्धा वाहतुक पुढे सरकायचे नाव घेईना. अचानक लक्षात येतं की अरे आपल्या सॅकमध्ये दोन सुंदर पुस्तकं आहेत. ती वाचायला इथेच सुरुवात करुया. निवडक केशवसुत.... लेखक वामन देशपांडे! मग मी कविता वाचायला सुरुवात करतो.

एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन मी जी स्वप्राणानें,
भेदुनि टाकेन सगळी गगनें,
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें,
अशी तुतारी द्या मजलागुनि.

इंजिनाजवळून येणारी गरम हवा, प्रदूषण, टळटळते ऊन, कोलाहल या सगळ्यांचे एक जालीम मिश्रण बसमध्ये तयार झाले आहे आणि मी आपला तुतारी वाचतो आहे.

जुने जाऊं द्या मरणालागूनि,
जाळूनि किंवा पुरूनी टाका,
सडत न एक्या ठायी टाका;
सावध! ऐका पुढल्या हांका;
खांद्यास चला खांदा भिडवुनि;

    या बसच्या समोरच दुसरी बस होती. ड्रायव्हर महाशय पुढच्या बसला इतकी चिकटवून चालले होते की जणू काही खांद्याला खांदा भिडवूनच चालला आहे. त्यातनं एखाद्या कोंबडीला पण जायची मारामार होईल. पाच, दहा, पंधरा मिनिटं झाली तर आम्ही आपले तिथेच. ड्रायव्हरच्या मुखावर मात्र कोणताही वैताग दिसत नाही. हे सगळे जणू काही रोजचेच आहे! तो शांतपणे सीटमागच्या कप्प्यातून पाण्याची बाटली (ऍक्वाफिना) बाहेर काढून पाण्याचे घोट घेत राहतो. सगळ्या आयुष्याचा कोळलेला अर्कच पचवण्याचे सामर्थ्य याच्यात असावे.

घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे
वीरांनो! तर पुढे सरा रे--
आवेशाने गर्जत ’हर-हर’!

    क्वचित पुढची बस सरकलीच तर क्लचवर तो बस उचलत असे. एव्हाना डाव्या बाजूलाही एक बस आलेली आहे. तिच्याही पुढे एक बस आहे. मात्र आमच्या आणि शेजारच्या बसमध्ये एक दुचाकीस्वार चांगलाच अडकलेला आहे. त्याला स्वारगेट चौकात डावीकडे हडपसरकडे जायचे आहे. तो डावीकडच्या बसचालकाला सांगतो की त्याला पलीकडे जाण्यासाठी त्याने थोडी जागा द्यावी. कारण हाही ड्रायव्हर त्याच्या पुढच्या बसला चिकटून चालला आहे. "तुला कुठं जायचंय?" ड्रायव्हरचा प्रश्न! "डावीकडे" हे उत्तर. "मलाही तिकडेच जायचंय" म्हणत ड्रायव्हर मला डोळा मारतो. मला भयंकर हसायला येतं. काय चाललंय काय राव? शेजारचा ड्रायव्हर अजून गाडी आत दाबतो, दुचाकीवाला ए, ओ करत ओरडायला लागतो. शेवटी एकदाचा सिग्नल सुटतो आणि आम्ही पुढे मार्गस्थ होतो. पुढे मग बीआरटीचा मार्ग! इथेही केवळ दोनच बसला यायला जायला जागा असूनही ड्रायव्हर आरामशीरपणे ओव्हरटेक करतोय. लोण्यातून सुरी फिरते तशी तो बस चालवतो. स्वारगेटनंतर लक्ष्मीनारायण, पंचमी हॉटेल, सिटीप्राईड येतं, जातं. बाराचा शो सुरु झालेला असावा. तिकिटखिडकीवर तुरळक माणसं दिसतात. स्टॉप येतात, लोक उतरतात, चढतात, थोड्या काळासाठी का होईना, कंडक्टरची गंगाजळी हळूहळू वाढतेय. विवेकानंद स्मारक येतं, छोट्याशा बागेत सावलीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा आहे. गळ्यात वाळलेला हार! शेवटी मी माझ्या स्टॉपवर उतरतो.

    ग्रंथालयातून दोन पुस्तकं बदलणं आणि एका पुस्तकाची खरेदी यांसाठी आपण घालवलेला वेळ याचा हिशोब करत मी घरी पोहोचतो. बघू! जमलं तर यावर एखादा लेखही लिहता येईल.

शनिवार, ८ मे, २०१०

कसाबला फाशी आणि सकाळचा चंपक अग्रलेख...

    कसाबला फाशी झाली. दोन दिवस झाले. समाजाची स्मरणशक्ती तशी कमी असतेच म्हणा. थोड्याफार दिवसांची गोष्ट आणि कुणाच्या हे लक्षातही राहणार नाही. मला मात्र सकाळमध्ये जो अग्रलेख प्रसिद्ध झाला तो वाचून हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे.
    बकवास शीर्षकापासूनच याची सुरूवात झाली आहे. "कसाबचा झाला; आता इतरांचाही करा हिसाब"
कसाब काय हिसाब काय? यमकाचा हा कसला फालतू अट्टहास?

    पण पुढे आख्खा अग्रलेखच इतक्या हास्यास्पद विधानांनी भरलेला आहे की शीर्षकाचे काहीच वाटायला नको. सुरुवातीचा भाग ठीक आहे. पण पुढेपुढे असली नमुनेदार विधानं केली आहेत ती बघण्यासारखी आहेत.
    "कसाब जिवंत हाती लागला त्यामुळे भारतातील अतिरेकी कारवायांमधील पाकिस्तानचा हात स्पष्ट झाला." - हे आधीही स्पष्ट झालेलं आहे, त्याने पाकिस्तानला काय फरक पडला? पाकिस्तानवर कुणी कारवाई केली आहे काय?

    "कसाब पकडला गेल्यामुळे पाकिस्तानला नाटक म्हणून का होईना, पण मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांसंबंधीचा खटला चालवावा लागला." - याच्यातून काय निष्पन्न झाले? कुणाला शिक्षा झाली?

    "दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअरमधे बॉंब ठेवताना पकडल्या गेलेल्या फैजलने आपण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवाया करण्यासाठी आल्याचे कबूल केल्याने महासत्तेला आता पाकिस्तानविरुद्ध डोळ्यांवर कातडे पांघरुन स्वस्थ बसणे शक्य होणार नाही." - अमेरिका? पाकिस्तानवर कारवाई? पाकला मध्येच आठवण आली की सज्जड दम, तंबी वगैरे देणे आणि दरवेळेस डॉलर्सच्या मदतीचा ओघ वाढवणे यापेक्षा अमेरिका दुसरे काहीही करत नाही. आता तुम्ही बरे झाले सांगितले. अमेरिका नक्कीच धोरणात बदल करेल.

    "वरच्या न्यायालयांमध्ये कसाबला झालेल्या शिक्षेची जसजशी शहानिशा होईल, तसतसे पाकिस्तानला अतिरेकी कारवायांशी असलेला आपला संबंध नाकारणे जड जाईल." - खी: खी: खी:

    "१९९३ च्या बॉंबस्फोट खटल्यापेक्षा कसाबचा खटला वेगाने चालला आणि त्यातील साक्षीपुराव्यांनुसार आरोपीला कठोर शिक्षा केल्याने भारताचा याबाबतीतील कठोरपणाही जगासमोर आला." - कुठे आहे हा कठोरपणा? आम्हाला कसा दिसला नाही अजून? काही ठराविक व्यक्तींनाच दिसतो काय? म्हणजे तुम्ही बॉंबस्फोट करा, शेदोनशे माणसं मारा आणि आम्ही त्याचा लवकर खटला चालवतो आणि त्यांना कठोर शिक्षा करतो. बकवास!

    "भारत हा अतिरेकी कारवायांसाठी कायमचा बकरा बनणार नाही हेही या निकालाने अतिरेकी कारवायांना पाठीशी घालणार्‍या आणि पाठबळ पुरवणार्‍या शेजारी देशांनी लक्षात घेतलेले बरे." - खी:खी: खी:! त्यांनी लक्षात घेतले आहे. तसे सांगणारा इमेल मला कालच आला. पण मग तरीही पुण्यातले बॉंबस्फोट कुणी केले बरे?

    "भारतीय न्यायव्यवस्थेवर असलेला आमचा विश्वास या निकालाने आणखी दृढमुल झाला अशी भावना अनेकांनी ठामपणे बोलून दाखवली." भारत हा एक मूर्ख लोकांचा देश आहे. कोण आहेत हे लोक? त्यांचा पत्ता तरी द्या. अरे अफजल गुरुच आता फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये २२ व्या नंबरला आहे. त्याला अजून शिक्षा नाही. आणि कसाबचं काय घेऊन बसलाय? मला तर असं वाटतंय की एखाद्याचा खून करुन फाशीची शिक्षा घेऊन बसावं. बरीच वर्षे आरामशीरपणे काढता येतील. पोटापाण्याची चिंता करायची कारण नाही. या काळात उत्तमोत्तम ग्रंथ वाचावेत, टिपणं काढावीत, लिखाण करावं. एकूणातच चिंतन, मनन करत आयुष्य घालवावं. कसला आला आहे पश्चात्ताप?

    "देशद्रोही कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आनंद व्यक्त करणारे, मिठाई वाटणारे मुस्लिम समाजातलेही नागरिक होते, ही देशफोड्या अतिरेक्यांना भारतीयांनी लगावलेली सणसणीत चपराक आहे." - ही असली वाक्यं लिहणारा कोण आहे? संपादक की बुजगावणं? कुठल्या जगात वावरता आहात तुम्ही? चपराक? चपराकचा अर्थ कळतो का तुम्हाला? साधं या अतिरेक्यांच्या यावनी दाढीलाही भारताला अजून हात लावता आलेला नाही आणि चपराक कशाची डोंबलाची? स्वत:ची पाठ थोपटायची तरी किती? या असल्या पुचाट विधानांनी स्वत:ची समजूत किती दिवस काढणार?

    एकंदरीत एखाद्या बुजगावण्याने हा अग्रलेख लिहलाय असेच मला तरी वाटत आहे. केवळ आणि केवळ जाहिरातींच्या मागे लागलेल्या आणि वर्षभर खरेदीची फालतू प्रदर्शने भरविणार्‍या सकाळने हे असले बकवास अग्रलेख लिहावेत तरी कशाला? तुम्हाला जर सरकारला कडक शब्दात सुनावता येत नसेल, जाब विचारता येत नसेल तर त्यापेक्षा वसंत संपात कधी येतो, सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम कधी करावा? आणि अधिक मास कधी येतो, त्यात काय काय करावे हीच चर्चा चालू राहू द्या की! कसे?